गोव्याचा (दु:ख)पुराणपुरूष

कवी व अवधूत कुडतरकरचे मित्र नरेंद्र बोडके यांनी लिहिलेल्या लेखातील हा निवडक भाग. हा  लेख अवधूत कुडतरकर षष्ट्यब्दीपूर्ती गौरविका ‘पाथेय’मध्ये (28 नोव्हेंबर 2009 रोजी प्रकाशित) आहे.

...
अवधूतची ओळख झाली आणि दु:खाचे कितीतरी कंगोरे समोर आले. पाठीवर दु:खाचे गाठोडे घेऊनच तो फिरत होता. बालपणीच वडील वारलेले. वयोवृद्ध आई, असूनही नसल्यासारखा वडील-भाऊ, मालमत्तेचे खटले, शिक्षणाची परवड, अक्षरश: निष्कांचन अवस्था... अशा स्थितीत आमच्याकडच्या सिगारेटचा एखादा झुरकाही त्याला पुरत असे. एखादी पावभाजी पक्वान्नासारखी वाटत असे. अनेकदा कैक तास त्याने काहीच खाल्लेले नसे. अशाही स्थितीत त्याची साहित्यावरची निष्ठा कधी डळमळीत झाली नाही. तो महान लेखक किंवा श्रेेष्ठ कवी नाही. त्याने तसा कधी दावाही केला नाही; पण लेखनावरची त्याची अविचल निष्ठा हेच त्याचे मला सर्वांत मोठे मोठेपण वाटते.

... कसाबसा तो एस. एस. सी. झाला. कसल्या कसल्या नोकर्‍या त्याने केल्या. त्यात कधी त्याला शारीरिक व्याधींनी ग्रासले. म्हापशाच्या टी.बी.हॉस्पिटलमध्ये वॉचमन म्हणून त्याने काम केले. तिथे बरेच अन्याय पाहिले. त्याच्या पद्धतीने  तो लढला, हरला आणि अखेल ती नोकरी त्याला सोडावी लागली. आत्मचरित्रांमध्ये सापडणारा आदर्शवाद प्रत्यक्ष जीवनात कुठे जातो कुणास ठाऊक ?

मग अवधूत कसली कसली पुस्तके किंवा कायकाय विकत फूटपाथवर बसायचा. त्यात ‘फुलबाग’च्या जुन्या अंकापासून त्याने स्वत: लिहिलेल्या किशोर-बाल साहित्याची छोटी छोटी पुस्तकेही असायची. ‘फुलबाग’चे संपादक अशोक माहिमकर त्याला पत्रे लिहायचे. त्याच्या कविता किंवा कथा छापायचे आणि त्याला  आठवणीने मानधनही पाठवायचे. असे अंक किंवा मनिऑर्डर आलेली असली म्हणजे आमच्या गप्पांना धूम्रवलयांचा साज चढायचा. …

... दरम्यानच्या काळात अवधूतचा ‘रंभागर्भ’ हा संग्रह निघाला. ‘दिगंबरा’ ही कादंबरी तो बरीच वषर्ष लिहित होता. या दोन्ही उपक्रमांत शिवानंद तेंडुलकरची छडी त्याच्यावर उगारलेली असायची. अनेक फेरफार करीत एक विशिष्ट उंची या दोन पुस्तकांमध्ये त्याने नक्कीच गाठलेली आहे.

...त्याच्या आदर्शवाद त्याला बालसाहित्य लिहिण्यास उद्युक्त करीत असावा असा माझा कयास आहे. वैयक्तिक अनुभवांचे साधारणीकरण करण्याच्या प्रयत्नात त्याने कथा लिहिल्या असाव्यात. ‘दिगंबरा’ ही कादंबरी म्हणजे त्याचे आत्मचरित्रच आहे. फक्त खरी नावे लिहिली, तर ते लोक शब्दांत पकडतील या भावनेतून कदाचित त्याने आत्मचरित्राला कादंबरी म्हटले असावे. अर्थात तो लेखकाचा अधिकार मानायला हरकत नसावी. आपले जगणे मांडून मोकळे होण्यासाठी त्याने कादंबरी लिहिली. आंतरिक उर्मीतून कविता लिहिल्या.

...इतक्या अनंत अडचणींतून त्याने स्वत:ला शिल्लक ठेवले हे महत्त्वाचे, नाही का ? पैशाच्या गरजेतून वृत्तपत्रीय स्तंभलेखन किंवा पत्रलेखन त्याने केले असावे. पण मुख्यत्वे तो कवी आहे. योगभ्रष्ट कवी आहे. त्याचे अध्यात्म त्याला तारून नेते आहे. या अध्यात्माच्या शोधात त्याने कैक बुवा पालथे घातले. शेेवटी त्याच्याजवळ त्याला ते सापडले. त्याला रंभागर्भ पोकळीचा शोध लागला. हा शब्द ज्ञानेश्‍वरांनी वापरला होता. केळीच्या गाभ्यात काहीच नसते. पोकळी. तिलाच रंभागर्भ म्हणतात. या पोकळीतूनच तर अख्खे झाड उद्भवते. बीइंग अ‍ॅण्ड नथिंगनेसचा हा खेळ अवधूतच्या लक्षात आला. ‘रंभागर्भ’फळला. अजून काय हवे ? अवधूतने कवितेसाठी संसार मांडला आणि कविता फळवून आपले पौरूष सिद्ध केले.

...फूटपाथवरच्या विद्यापीठात माणसे वाचायला तो शिकला. प्रतिष्ठेच्या आहारी गेलेली माणसे कशी वागतात ते त्याने पाहिले. माणसे आपल्याला कशी टाळतात ते त्याने पाहिले. फूटपाथवरून तो म्हापसा अर्बन बँकेसमोरच्या स्वत:च्या गाड्यावर बसायला लागला. …

...शिक्षण, नोकरी, नाती, पैसा, मालमत्ता अशा सगळ्याच ठिकाणी  त्याने गोते खाल्ले. आई गेली ते दु:ख त्याने कसे पचवले ते मला माहीत नाही. आतेबहिणीने त्याला स्थळ आणले व दारिद्ˆयाशी स्पर्धा करीतच त्याचे लग्न झाले. ...मराठी अकादमीत त्याने 18 वर्षे काढली. ही वर्षे त्याने एरवी कशी काढली असती कुणास ठाऊक.